अमळनेर तालुका प्रतिनिधी- रयत संदेश न्यूज
अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच नैतिक मूल्ये, शिस्त, स्वच्छता आणि आध्यात्मिक विचार रुजले जाऊन त्यांची जपणूक व्हावी. तसेच आजच्या पिढीला केवळ शैक्षणिक नव्हे, तर उत्तम संस्कारज्ञानही देणे गरजेचे आहे, या उद्देशाने बुधवार, दि. 5 ऑगस्ट व गुरुवार, दि. 6 ऑगस्ट रोजी शहरातील द्रौ. रा. कन्या शाळा तसेच भगिनी मंडळ येथे मंगल बालसंस्कार केंद्रांतर्गत वर्ग घेण्यात आले. यामध्ये मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त आणि आध्यात्मिक विचारांची रुजवण कशाप्रकारे आपल्यामध्ये करायला हवी, याबाबतचे धडे देऊन ते अंगीकारण्याचे आवाहन केले.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनातून गेल्या तीन वर्षांपूर्वी मंगल बालसंस्कार केंद्र स्थापन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी शहरातील विविध शाळांत बालसंस्कार वर्ग घेतले जातात. यंदा शहरातील द्रौ. रा. कन्या शाळेत बुधवारी, तर गुरुवारी भगिनी मंडळ येथे हे वर्ग घेण्यात आले.
सुरूवातीला खानदेश शिक्षण मंडळाच्या संचालिका सौ. वसुंधराताई लांडगे, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त डी. ए. सोनवणे, वेदशास्त्र संपन्न केशव पुराणिक, जयेंद्र वैद्य व शुभम वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत द्रौ. रा. कन्या शाळेत दीपप्रज्वलन करून सरस्वतीमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना विविध मंत्र, बालगीते, बालगोष्टींसह एकूणच दिनचर्येबद्दल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना संस्कारमय जीवनाचे महत्त्वही पटवून दिले.
कार्यक्रमास द्रौ. रा. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमाताई सूर्यवंशी, पर्यवेक्षिका आर. एस. सोनवणे तसेच सर्व शिक्षक-शिक्षिकांसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—




