अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
भारतीय संस्कृतीत श्री तुळशी विवाहाला अनन्यसाधारण महत्व आहे. श्री तुळशीच्या विवाहानंतर वधू- वरांच्या ब्रम्हगाठी विवाह सोहळ्यांच्या रुपाने बांधल्या जातात. ही परंपरा कायमस्वरुपी टिकून राहावी, श्री मंगळ ग्रह मंदिरात येणाऱ्या विवाहेच्छुकांच्या इच्छापूर्तीसाठी परमेश्वराची विशेष आराधना करावी, या उद्देशातुन मंगळ ग्रह सेवा संस्थेने अतिशय शुभ व परम् पवित्र अशा मंगलदिनी अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री तुळशी विवाह सोहळ्याची परंपरा सुरु केली आहे. यंदाचे हे 14वे वर्ष आहे. बुधवार, दि. 5 रोजी सायंकाळी 7 वाजून 22 मिनिटे या शुभ मुहुर्तावर अतिशय चैतन्यमयी व मंगलमय वातावरणात शास्त्रोक्त पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. सर्व प्रकारच्या खर्चिक तामझामला फाटा देऊन सनातन व साध्या पद्धतीने संस्कृतीबद्ध कार्यक्रम झाला.
दरम्यान, सकाळी आठ ते साडेआठ दरम्यान वाग्दान अर्थात वरराजा व वधूराणी यांचे यजमान अनिल मराठे व मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील यांच्या हस्ते पूजन झाले. साडेआठ ते नऊ दरम्यान हळदीचा कार्यक्रम झाला. अमळनेर शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र भगवान ठाकरे व दंत चिकित्सक डॉ. श्वेता राजेंद्र ठाकरे पुजेचे मानकरी होते. यावेळी त्यांनी मधुपर्क पुजनही केले. साडेनऊ ते 11 दरम्यान कन्यादान व लाजा होम झाला. त्यासाठी नवविवाहीत नितीन सदाशिव पाटील (नंदगाव, ता. अमळनेर) हे सपत्निक यजमान होते. सायंकाळी पाच वाजता वराच्या वेषातील भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्तीची सजविलेल्या रथात व श्री मंगळ ग्रह देवाची उत्सव मूर्ती असलेल्या पालखीची मंदिर परिसरात वाजत- गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यात स्त्री- पुरुष भाविकांनी जल्लोषपूर्ण नृत्याचा आनंद घेतला. या सोहळ्याचे यजमान मनोज पाटील (कलाली, ता. अमळनेर) यांनी सपत्निक पालखी पूजन, हरिहर भेटीचे पूजन व मंगल आरती केली. या शाही स्वरुपाच्या विवाह सोहळ्यात वर- वधूच्या मामांची भूमिका माजी नगरसेवक तथा मंगल सेवेकरी बाळा पवार व मनोहर दीक्षित यांनी निभावली. ज्येष्ठ पुरोहित केशव पुराणिक व कर्मब्रह्मा परशुरामजी शर्मा यांनी मुख्य पौरोहित्य केले. त्यांनी विधी अर्थात मंगलाष्टक म्हटले. त्यांना मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, शुभम वैष्णव, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, मंदार कुळकर्णी, वैभव लोकाक्षी, हेमंत गोसावी, विनोद पाठक, सारंग पाठक, सुनील मांडे, यश जोशी, गोपाळ पाठक, चेतन नाईक, प्रवीण भंडारी यांच्यासह भक्त परिवाराने सहकार्य केले.
सोहळा यशस्वितेसाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुळकर्णी, विश्वस्त अनिल अहिररराव, श्रीमती जयश्री साबे, डी. ए. सोनवणे, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, विनोद कदम, जी. एस. चौधरी, एम. जी. पाटील, आशिष चौधरी, आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुळकर्णी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. आर. जी. चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी मंगळग्रह मंदिरातील सेवेकरी व वऱ्हाडींच्या रुपाने आलेले शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चाली, रुढी व परंपरांचे जतन
दरवर्षी मंगळग्रह सेवा संस्था खूप भव्य प्रमाणात श्री तुळशी विवाह महासोहळा साजरा करीत होती. मात्र, यावर्षी 10 जून रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांनी विवाह सोहळे पारंपरिक हिंदु संस्कृतीप्रमाणे कमी खर्चात साजरे करावेत यासह अनेक समाजाभिमुख बाबींच्या शपथ देण्यात आल्या. तेव्हापासून अभिषेकासाठी येणाऱ्या प्रत्येकाला ही शपथ दिली जाते. त्यामुळे मंगळग्रह सेवा संस्थेनेही तुळशी विवाह महासोहळा साधेपणाने मात्र पूर्णतः सनातन हिंदु धर्माच्या चाली, रुढी व परंपरेप्रमाणे साजरा केला.




