अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क
अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी सुपोषण, संवर्धन या राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ गुरुवार, दि. 19 मार्च रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथून होणार आहे. दुपारी 2 वाजता आयोजीत या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह विविध महानुभाव तसेच अनेक सामाजिक, धार्मिक संस्थांसह संघटनांचे प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
देशातील शेतजमीन हळूहळू निकस व नापिक होत चालली आहे. अनेक ठिकाणी तर ती रासायनिक खते विषारी कीटकनाशकांचे बेसुमार वापरामुळे अत्यंत विषारीही झाली आहे. या गंभीर परिस्थितीला आळा घालण्यासाठी कृषी व पर्यावरण क्षेत्रातील विविध सामाजिक, धार्मिक संस्थांसह संघटनांनी एकत्रित सन 2021पासून भूमी सुपोषण व संवर्धन या राष्ट्रव्यापी जनअभियानाची सुरूवात केली आहे. गेल्या पाच वर्षांत देशभरात सुमारे 30 हजार गावे व 54 हजार शहरी ठिकाणी भूमिपूजन व प्रबोधन कार्यक्रम राबविले गेले आहेत. त्याच अनुषंगाने येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्री भूमी मातेच्या जन्मदिनी अर्थातच चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या मंगल मुहूर्तावर या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ होणार आहे. 19 मार्च 2026 ते अक्षयतृतीया (19 एप्रिल 2026) या कालावधीत संपूर्ण देशभरात हे अभियान राबविले जाईल.
या अभियानात विविध सामाजिक, धार्मिक संस्था, हजारो गोशाळा, स्वयंसेवी संस्था, देशातील सर्व कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रांना सहभागी करून घेतले जाणार आहे. अभियानांतर्गत भूमिपूजन, भूमी सुपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान, प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा, जनजागृती शिबिरे व प्रदर्शने आयोजीत केली जातील. तसेच शहरी भागात जैविक व अजैविक कचरा वेगळा ठेवणे, जैविक कचऱ्यापासून खत निर्मिती यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून जनजागर केला जाणार आहे. या राष्ट्रव्यापी अभियानाच्या जनजागर शुभारंभप्रसंगी मोठ्या संख्येने सहभाग नोफ्लदवून राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करावे. तसेच कृषी क्षेत्रात क्रांती घडविण्यासाठी सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांनी केले आहे.
दरम्यान, अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रोटरी क्लब, लायन्स क्लब, निरंकारी परिवार, विविध समाजसेवी संस्था व संघटना यांचे पदाधिकारी हे अभियान यशस्वितेसाठी परिश्रम घेत आहेत.
या महानुभावांची लाभणार उपस्थिती
कन्हेरी आश्रमाचे प. पू. आदित्य काडसिद्धेश्वर महास्वामी, प. पू. संतश्री सखाराम महाराज वाडी संस्थान, अमळनेरचे गादीपती प्रसाद महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समिती सदस्य भागैयाजी, अक्षय कृषी परिवाराचे अध्यक्ष मनोजभाई सोलंकी, उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे, भूमी सुपोषण अभियानाचे राष्ट्रीय संयोजक पद्मश्री सुभाष शर्मा, नवलजी रघुवंशी (इंदूर), सहसंयोजक आलोकजी गुप्ता (दिल्ली), सचिव डॉ. बेरिंदम गुणाकरजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारक डॉ. दिनेशजी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे महाराष्ट्र व छत्तीसगड मुख्य संयोजक सुनीलजी घनवट, महाराष्ट्राचे कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिलदादा पाटील यांच्यासह राजकीय व कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.




