अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ ते शिरुड दरम्यानचा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचला असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवघ्या चार किलोमीटरच्या या मार्गापैकी केवळ दोन किलोमीटरपर्यंतच दुरुस्ती करण्यात आली आहे, तर उर्वरित भाग पूर्णपणे खड्डेमय झाल्याने वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
मंगरूळ पासून वळणावरील पुढे शिरुड व कावपिंप्रीकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असून दररोज दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक येथे सुरू असते. पुढे अनेक गावांना जोडणारा हा रस्ता असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. मात्र मंगरूळपासून सुमारे दोन किलोमीटरनंतर रस्त्याची अवस्था पूर्णपणे खालावली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि धोकादायक पृष्ठभाग यामुळे वाहतूक जीवघेणी बनली आहे.
विशेषतः समोरून अवजड वाहने आल्यास दुचाकीस्वारांना रस्त्याच्या कडेला उतरावे लागते. साईड पट्ट्या घसरलेल्या असल्याने आणि उडणाऱ्या धुळीमुळे वाहनांचे संतुलन बिघडून अपघातांचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी खोल खड्डे असल्याने वाहनांचे नुकसानही होत आहे. भरधाव वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून परिसरातील आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
रात्रीच्या वेळी खड्डे न दिसल्याने अपघातांचा धोका अधिकच वाढतो. केवळ अर्धवट दुरुस्ती करून उर्वरित रस्ता का दुर्लक्षित ठेवण्यात आला, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पुढील भागात गावे नाहीत का? असा प्रश्नही ग्रामस्थ विचारत आहेत.
अपूर्ण दुरुस्तीमुळे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित विभागाने तातडीने संपूर्ण रस्त्याचे दर्जेदार काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा या मार्गावर मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करत संभाव्य दुर्घटनेस प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.




